spot_img
Homeभटकंतीवीकेंड कोकण.

वीकेंड कोकण.

काल कोकणातून परतीच्या मार्गावर होतो. ताम्हिणीतील पर्वतरांगाना लाभलेले अफाट निसर्ग सौदंर्य कितीही वेळा अनुभवा दर वेळी तेव्हढीच मजा, तेव्हढेच समाधान.
वीकेंडला कोकणात जायचे ठरले होते. दिवेआगर,दापोली,लाडघर हि नेहमीची ठिकाण सोडून यावेळी नवीन बीचला जायचे होते, एकाने नागांव बीच सुचवला. आणि ठरलेला कार्यक्रम कॅन्सल व्हायच्या आत आम्ही निघालो. निघताना सवयीप्रमाणे मित्राने गुगल मॅप लावला, डेस्टिनेशन टाकले आणि गाडी निघाली. नागांव हे अलिबागच्या जवळ, साहजिकच गुगलवाल्या बाईने जवळचा मार्ग शोधला आणि न्हेले आम्हाला मुंबई एक्सप्रेसवेला, पुढे खोपोलीमधून पेन मार्गे नागांवला पोहचवले मात्र या संपूर्ण प्रवासादरम्यान “आमचो कोकण ” वगैरेचा अनुभव क्वचितच आला. एक्सप्रेसवेला तर सोडूनच द्या पण खोपोलीतून एक्सप्रेसवे सोडल्यावरही संपूर्ण मार्ग हा शहरीकरणाच्या विळख्यात अडकत चाललेला दिसला. अगदी समुद्र किनारी नागांवला पोहचल्यावर हि तोच अनुभव. अनेक बांधकाम चालु होती. दोन-दोन, तीन-तीन माजली हॉटेलस दिसत होती, कोकणातील वाड्या आता फार्महाउस सारख्या दिसू लागल्या होत्या. इमारतीच्या कामात जांभ्याचा वापर करून कोकणचे जुने रूप टिकऊन ठेवण्याचा केलेला प्रयत्न अगदीच केविलवाणा वाटत होता.
अलिबागच्या या भागातील अनेक वाऱ्या पूर्वी शाळा, कॉलेजच्या दिवसात करून झाल्या होत्या, या भागातील पर्यटकांची गर्दी, व्यावसायीकीकरणामुळे नंतर नंतर त्या भागात जायचे टाळत होतो. याच व्यावसायिकरनाणे अलिबागच्या आजूबाजूच्या परिसरालाहि आपल्या विळख्यात घेतल्याचा अनुभव नागांवला पोहचल्यावर आला. मुंबई सारखे शहर जवळ असल्याने हा भाग जास्त प्रभावित होत गेला असेल कदाचित. पुणेकरांनी त्यानां तुलनेने जवळ असलेल्या दापोली, दिवेआगर आणि आजूबाजूचा परिसरात गुंतवणूक केलेली आहेच कि. मात्र तरीही या भागातील कोकणी बाझ सुदैवाने आजून चांगलाच टिकून आहे.
असे असले तरी जेथे आम्ही राहायला होतो ती वास्तू बरीच मोठी असल्याने नारळाची, सुपारीची, आंब्याची बर्यापैकी दाट झाडी, जांभ्यात बांधलेली विहीर, नवीन बांधलेल्या घराबरोबरच जुने कौलारू घर, यामुळे त्या कोंकणातील वाडीचा आत्मा टिकऊन ठेवला होता. खाण्यापिण्याची हि सुंदर व्यवस्था असल्याने मजा आली. ज्यांना खोकला होता त्यांना खोकल्याचे औषधही जवळच मेडिकल मध्ये उपलब्ध झाले होते. 😃
जेवणानंतर रात्री २ पर्यंत गप्पांची मैफिल रंगली होती.
सकाळी कांदा पोहे, उपम्याचा नाष्ट्या घेऊन निघालो. आणि हो ते उकडीचे मोदक व त्यावर तुपाची धार ते सांगायचे विसरलोच कि त्याशिवाय कोकण ट्रिप कसली.
असो, तर कोकणामध्ये जी मजा अनुभवायला आपण जातो तेव्हढीच मजा हि कोकणच्या प्रवासादरम्यान निसर्गाचा आस्वाद घेण्यात असते. आधी सांगितल्या प्रमाणे जाताना त्या आस्वादाला आम्ही मुकलो होतो. त्यामुळे हि झालेली निराशा भरून काढण्यासाठी परतीच्या मार्गात भरून काढण्याच्या ठरले. त्या गुगल वाल्या बाईच्या नादाला न लागता पूर्वी दुचाकीवर या भागाचा केलेल्या सफरीच्या अनुभवावर प्रवास करायचा ठरले. अंतर कितीही वाढला तरी चालेल परतीचा प्रवास हा ताम्हिणीतूनच करायचा.
प्रवास सुरु झाला व सुदैवाने संपूर्ण रोड चांगल्या अवस्थेत, खड्डे मुक्त तर मिळालाच व वाहतुकीचे प्रमाण हि कमीच असल्याने ड्रायव्हिंगची मजा घेता आली. या वेळी पाऊसही बराच लांबल्याने घाटातील धबधबेहि अनुभवायला मिळतील ही अपेक्षा होतीच. प्रवासात गप्पा मारताना एकाने ताम्हीणीचे एक वेगळे वैशिट्य गमतीदार पद्धतीने सांगितले. म्हणे धबधबे काय अनेक ठिकाणी असतात परंतु ताम्हिणीत सगळ्या प्रकारच्या पर्यटकाना साजेसे असे धबडबे आहेत, अगदी फॅमिली वाल्यांसाठी तुलनेने संथ वाहणारे, जोडीने फिरायला आलेल्यांसाठी आत जंगलात निवांत कमी गर्दीचे, तरुण मंडळींसाठी उंचावरून पडणारे आणि आगाऊ, अतिउत्साही लोकांसाठी तीव्र उतार असलेले किंवा खोल दरीत कोसळणारे धबधबे आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेचा भाग असलेल्या या ताम्हिणीतुन पुणे रायगड जिल्ह्यांना जोडणारा हा घाट. घाटाच्या अलीकडेच कुंडलिका व्हॅलीला जाण्यासाठी एक वेगळा रास्ता आहे. भल्या मोठ्या अशा खोल दरीतून वाहणारी कुंडलिका नदी व आजूबाजूच्या पर्वतरांगा पावसाळ्यात वेगळेच रूप धारण करतात. फटोग्राफीसाठी हे सुंदर ठिकाण. धुक्यांच्या जमा होण्याची तर कधी धुके हटण्याची वाट पाहत फोटोग्राही करताना अनेक पर्यटक इथे दिसतात. जेव्हढा सुंदर तेव्हढाच बेशिस्त मंडळींसाठी धोकादायक असा हा पॉईंट आहे. त्यामुळे जरा जपुन . जाताजाता आठवले म्हणून सांगितले तसे वेळेअभावी काल मात्र इथे थांबता आले नाही.
रस्त्यालगत दुतर्फा घनदाट झाडी, भिजलेला काळा डांबरी रस्ता, पर्यटकांची गर्दी, जरा बेशिस्त पार्किंग, धबधब्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता न आलेले इतर सामान्य प्रवासी, वडापाव चहाच्या टपऱ्या, पावसाच्या मधे मधे पडणाऱ्या सारी, थंडगार वाहणारा वारा यातून हा ताम्हिणीचा मजेशीर प्रवास चालू होता. उजव्या बाजूला पर्वतरांग धुक्यामधून कधीमधी दिसत होती तर डावीकडे आता मुळशी डॅमचे बॅक वॉटर आणि काठावर हिरवीगार भात शेती.
घाट संपुन आता हळुहळु पौड च्या ट्र्याफिक ची चाहुल लागु लागली आणि शहरातील वाहतुकीला बगल देत पौड फाट्यावरून कोळवण कडे गाडी वळवली.
पुढे पौड-कोळवण रोड सोडुन घोटावडे फाट्यावरून चांदे-नांदे करत सुस ओलांडून बाणेरला पोहचलो.
या संपूर्ण परतीच्या मार्गाचे वैशिट्य म्हणजे अगदी नागांव वरून निघाल्यापासुन घराच्या जवळ अगदी सुसगावा पर्यंत हिरव्या गार डोंगर रंगानी, दाट धुक्यानी आणि भूर भूर पावसाने आमची साथ सोडली नाहीच.

- Advertisement -

spot_img